मूळ लेखक: एस एल भैरप्पा अनुवाद: उमा कुलकर्णी
भैरप्पा यांची दोन पुस्तके मी याआधी वाचली आहेत. 'मंद्र' ही संगीत विषय आणि मानवी संबंध गुंतवून आपल्याला गुंतवून ठेवणारी कादंबरी आकस्मितपणे वाचणे झाले. आणि 'पर्व' हा महाभारताचा अद्भुत रीतीने उलघडलेला पट मागून मागून मी वाचला आणि महाभारतातील प्रत्येक पात्राची नव्याने ओळख झाली. 'आवरण' भैरप्पांचं अजून एक विस्मयकारी असे पुस्तक आहे.
'आवरण' आजच वाचून पूर्ण झाले आणि भैरप्पांनि अजून एका अफलातून पुस्तकाद्वारे माझ्या विचारसरणीत आणि ज्ञानात अमूल्य भर घातल्याची जाणीव झाली.
धार्मिक जिहाद, लव्ह जिहाद आणि मोदीपर्व पूर्वी असलेली 'सेक्युलर' परिस्थिती याच काळात लिहिली गेलेली आणि 'सेक्युलरिसम' याची ऐतिहासिक पुराव्यांसकट चिरफाड करणारी इतिहासावरील ऐतिहासिक कादंबरी आहे असे म्हणू शकतो. भैरप्पांची वैचारिक पातळी जेवढ्या उच्च प्रतीची आहे, तेवढ्याच उच्च प्रतीचा अनुवाद उमा कुलकर्णी यांनी केल्यामुळे आवरण नक्की वाचावी अशी कादंबरी झाली आहे. यात वेगळं काहीच नाही म्हणा, त्यांची पुस्तके एकदा वाचण्यास सुरुवात केली की संपेपर्यंत सतत वाचत राहावं अशीच असतात.
खरं तर याला कादंबरी न म्हणता इतिहासाविषयीचे पुस्तक म्हटलेलं जास्त समर्पक आहे असं वाटतं. नाट्य आणि सिने क्षेत्रात असलेली एक हिंदू मुलगी भावनेच्या आहारी जाऊन तिच्याचबरोबर शिकत असलेल्या मुसलमान मुलाशी लग्न करायचं ठरवते. पण मुस्लिम मुलाची अट असते की लग्नापूर्वी तिने धर्मांतर करावं. वरवर आधुनिक विचारांचा भासणारा प्रियकर लग्न झाल्यानंतर किती कट्टर इस्लामी असतो ते बघून तिला धक्का बसतो. सनातनी वडिलांना झुगारून लग्न केलेली लक्ष्मी पण हळू हळू मुस्लिम वातावरणात राहून राहून स्वतः कट्टर मुस्लिम बनते आणि गोमांसही खाते.
एक दिवस अचानक तिचे वडील वारल्याची बातमी समजते आणि इथून पुढे कथानक गाभाऱ्यात शिरते. लेखक कर्नाटकचे असल्यामुळे कर्नाटकाची पार्श्वभूमी घेतली गेली आहे. तर वडिलांच्या कार्यासाठी जेव्हा ती तिच्या गावी पोहोचते तेव्हा वडिलांची खोली हिंदू शासनकर्ता आणि मुसलमान शासनकर्ता यांवरील पुस्तकांनी भरलेली पाहून आश्चर्यचकीत होते. मग हळू हळू ती एक एक करून सर्व ऐतिहासिक पुस्तके वाचून काढते आणि सत्य तिच्या समोर येतं. कसं मुस्लिम शासनकर्त्यांनी जाणीवपूर्वक आणि योजनाबद्ध पद्धतीने हिंदूंच्या धार्मिक प्रार्थनास्थळांची नासधूस केली. कसे मुस्लिम राजे आणि सरदार मोठमोठे जनानखाने आणि लग्नाच्या ४ व्यतिरिक्त जनानखान्यातील शेकडो स्त्रियांचा मुक्त उपभोग घ्यायची पद्धत होती. कसे पकडलेल्या हिंदू राजघराण्यातील आणि इतर पुरुषांचे लाकडी चिमट्याने पौरुषत्व नष्ट करण्याचे आणि नंतर त्यांचे धर्मांतर करण्याचे कारस्थान होते. कशा प्रकारे औरंगजेब या धर्मांध मुस्लिम राजाने जाणीवपूर्वक काशी येथील देऊळ तोफेने उडवून दिले वगैरे वगैरे अनेक मुद्दे हे संधरबांसहित आपल्यासमोर मांडले आहे.
याचबरोबर विषारी कम्युनिष्ट विचारसरणीचे, उच्चशिक्षित शास्त्री ज्यांचे मुख्य कार्य हिंदूंचे खच्चीकरण करणे असते. आणि सरकारी पातळीवरही शिक्षणात खरा इतिहास न लिहिता कसे बदल केले जातात हे अत्यंत रोमांचकरित्या भैरप्पांनी गोष्टीच्या रूपात मांडले आहे.
तर अशी आहे ही दोन वर्षात २२ आवृत्त्या निघालेली अफाट लोकप्रिय आणि असामान्य, संदर्भांसहित लिहिली गेलेली कादंबरी.
टीप: कादंबरीची सुरवातच माझ्या आवडत्या ठिकाणी म्हणजे हंपी येथे होते. तेथील हात नसलेली काहीशा भग्न अवस्थेतील प्रसिद्ध नृसिंह मूर्ती. जेव्हा कादंबरीतील मुख्य पात्र लक्ष्मी ते बघते आणि विचार करते की मुसलमान आक्रमणकर्त्यांचा उद्धेश जर देवळातील पैसे चोरायचा असेल तर मग हिंदूंच्या मुर्त्या का फोडल्या गेल्या? यामागचे खरे कारण काय असावे? मी ही ती नृसिंह मूर्ती बघितली आहे, आतापर्यंत माझ्याही मनात हा विचार कधी आला नव्हता की ती अशा भग्न अवस्थेत का आहे! आवरण वाचून कळाले की पैशांसाठी देऊळांवर आक्रमणे व्हायची ही तर फक्त कारणे आहेत, मुख्य उद्धेश होता देऊळ नाश करण्याचाच!


टिप्पण्या