'पडघवली' लेखक - गो नी दांडेकर पाने- २२२ प्रकाशन- मौज
- इवलं हातावर हागल्याशिवाय डोळ्यात फुंकरसुद्धा घालायची नाही
- माकड गेलं लुटी नि आणल्या दोन मुठी
- फाशांचा डाव नि दैवाचा घाव
- पायावर पाणी घाल म्हटलं, तर तोरड्या किती तोळ्याच्या...
- भित्री भागुबई, चुलीशी बसुबाई
- पोरीत पोरगा लोंबडा...
- फट म्हणता सन्याशी मरायचा!
- नागव्यांच्या गावी पितांबारची पेठ
- आपलं घर नि शेणाने भर
कोकण म्हटलं की सगळंच निराळं. कोकणचे पाणी असो, माणसं असो किंवा त्यांची शिवराळ वाटणारी भाषा. पुस्तकातील वरील काही कोकणी म्हणींवरून त्याचा प्रत्यय आला असेलच. पण कोकणाची खरी ओळख करून घ्यायची असेल तर 'पडघवली' वाचावे.
पडघवली हे एक पुस्तक नाही तर काही वर्षांपूर्वीच्या कोकणाचे चलचित्र आहे. एक एक पान म्हणजे एक एक सीन वाटतो. सुरुवात शिवाजी महाराजांच्या काळातील कोकणात होते. कसे अंजनवेलीच्या किल्लेदाराकडे कारकून असलेल्या केशवभटांनी स्वतः चे रक्त सांडून सिद्दी च्या मुसलमानी चाच्यांची खोड मोडून कोकणातील गणपतीपुळे, गुहागर, अंजनवेल असा परिसर हिंदूंसाठी सुरक्षित केला. बक्षीस म्हणून काय पाहिजे असे किल्लेदार विचारतो तेव्हा केशवभट म्हणतात, 'जागा द्या बसायला, नांदायला. फार काय करायची? घोंगडीएवढी द्या.' आणि मग बघा गम्मत केशवभटांच्या हुशारीची.
केशवभटांनी जमिनीत खुंटी ठोकली, तिला घोंगडीच्या सुताचे टोक बांधलं आणि एका हातात घोंगडीच्या सुताचा गुंडा आणि दुसऱ्या हातात तलवार घेऊन निघाले केशवभट माजलेल्या रानात. चार घटकांनी केशवभट खाडीच्या अंगाने हजर. अंगावर रक्ताचा शिंपडा, तरवार रक्तानं न्हायलेली. सुताचे दुसरे टोक त्यांनी येऊन खुंटीत अडकवलं. "धनी, ही एवढी घोंगडभर जमीन!" आणि किल्लेदार अंगावरच्या रक्ताबद्दल विचारतात तेव्हा कशवभट म्हणतात, 'जंगलाच्या राजाचं (वाघ). तुम्ही जागा दिलीत. पण त्यानं कुठं दिली? भांडावं लागलं त्याच्याशी. दोन घाव दिले, दोन घेतले."
तर असा जन्म होतो पडघवली गावाचा. आणि तिथून पुढे सुरु होते एका कोकणातल्या गावातील महाभारत. सुरुवातीला रसरशीत कोकणात आपण प्रत्येक दिवस आणि सण आनंदात साजरा करतो. हळू हळू गाव वाढू लागते, लोक जमू लागतात आणि एका सडक्या आंब्याने अक्खी पेटी नासवावी अगदी तसे काही वाईट प्रवृत्तीचे लोक पडघवली नासवतात. पण या पूर्ण प्रवासात आपण पडघवलीतच असतो. कधी केशवभटांबरोबर, कधी अंबे बरोबर, तर कधी धिप्पाड गनांभावजी, दुर्गावंस, बनी, आतेसासूबाई, मामंजी आणि नासक्या व्यंकू आणि अशा असंख्य पडघवलीकरांबरोबर.
काही वर्षांपूर्वी मी विश्वास पाटील यांचे 'पांगिरा' पुस्तक वाचले होते. ती आहे देशावरच्या खेड्याची गोष्ट, कसं उसाच्या नादाने सुजलाम सुफलाम गावांची कळा घालवली. 'पडघवली' आणि 'पांगिरा', एकच सत्य आपल्यासमोर ठेवते. एक कोकणातल्या टुमदार खेड्याची करुण कहाणी आणि दुसरे देशावरच्या धष्टपुष्ट गावाची दुःखद गोष्ट.
पुढच्यावेळी कोकणात गेला की पडघवलीला नक्की भेट द्या. तिथे मोकळ्या, मोडकळीस आलेल्या घरांमध्ये सगळे पडघवलीकर नक्की भेटतील.



टिप्पण्या